३० जान्युअरी १९४८
.
शुक्रवार होता त्या दिवशी. तो नेहमीसारखा सर्वसाधारण दिवस होता.
९ सप्टेंबर १९४७रोजी कलकत्याहून आल्यापासून गांधीजींचा मुक्काम बिर्ला हाऊसमध्येच होता.
३०जानेवारीला नेहमीप्रमाणेच गांधीजी पहाटे ३.३० वाजता उठले होते.
प्रार्थना आणि सकाळची आन्हिकं आटोपल्यावर पुन्हा ते थोडावेळ झोपले.
त्यादिवशी सकाळी सहालाच आर के नेहरूंच्या पत्नी त्यांना भेटायला आल्या.
हळूहळू, दिवसभर येणाऱ्यांची रांगच लागणार होती.
पाकिस्तानातले भारताचे उपायुक्त मलकानी, बीबीसीचे बॉब स्टिम्सन, गुजरातचे मुख्यमंत्री ढेबर, रसिकलाल पारेख असे बरेच लोक भेटणार होते.
संध्याकाळी ४ वाजता वल्लभभाई पटेल आणि ७ वाजता नेहरूंना भेटीसाठी बोलावलं होतं.
लाईफ मासिकाची प्रसिद्ध छायाचित्रकर्ती मार्गारेट बूर्क व्हाईट २ वाजता मुलाखतीसाठी आली होती.
“मला सव्वाशे वर्षं जगायला आवडेल असं तुम्ही नेहमीच म्हणत आला आहात, कोणती अशी आशा यामागे आहे?” असं तिनं विचारल्यावर गांधीजी म्हणाले, “आता मला तसं वाटत नाही. मला आता काही आशा उरली नाही. आज जगात आसपास जे घडतंय ते पाहून अशा काळोखात मला जगायचं नाहीये.”
२० जानेवारीला प्रार्थना चालू असताना बॉम्बस्फोट झाला होता. गृहमंत्री पटेलांनी तिथं एका हेड कॉन्स्टेबल आणि चार हवालदारांची नियुक्ती केली होती. संशयास्पद कुणी आढळलं तर तपासणी व्हावी असे वाढीव सुरक्षाकर्मींना आदेश होते.
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याची परवानगी मिळावी अशी डिआयजींनी विनंती केली. गांधीजींनी ती धुडकावून लावली. ज्यांना स्वतःसाठी सुरक्षेची गरज लागते त्यांना जगण्याचा अधिकार नाही, गांधीजी म्हटले होते.
चार वाजता पटेल आपल्या लेकीसह आले. पाच वाजले तरी त्यांचं बोलणं संपलेलं नव्हतं. प्रार्थनेची वेळ झालेली होती. पाच वाजून दहा मिनिटाला त्यांना आठवण करून दिल्यावर ते उठले.
“उशीर झाला. हे मला आवडत नाही.” ते रागावून म्हटले. आवारात मागे असलेल्या प्रार्थनेच्या जागी निघाले. लोकांची गर्दी झालेली होती. गांधीजी पायऱ्यांवर होते. तिथून २५ फुटांवर लाकडी चौथऱ्यावर ते जाऊन बसणार होते.
पाच-सहा पावलं चालले असतील तेवढ्यात आडव्या आलेल्या मारेकऱ्यानं वाकून नमस्कार करण्याच्या मिषानं पिस्तुल काढलं आणि गोळ्या झाडल्या.
ते बेरेटा एम १९३४-सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल होतं.
फटाक्यासारखा बारका आवाज झाला. क्षणभर कुणाला काही कळलंच नाही.
गांधीजी कोसळले आणि तिथेच गतप्राण झाले. तोंडून एक अक्षर निघालं नाही.
प्रार्थनेनंतरच्या त्यांच्या मनोगतात गेले काही दिवस ते म्हणत होते, आजूबाजूला चाललेला राक्षसी हिंसाचार निमूटपणे पाहाणं मला शक्य नाही. देवानं आता मला उचलावं.
ते प्रार्थनेच्या वाटेवर असतांनाच गेले.
चालते-बोलते असतांना.
तेव्हा घड्याळात पाच वाजून सतरा मिनिटं आणि तीस सेकंद झाले होते.
गणेश विसपुते
-----------------------------------------------------------------------------------
नरहर कुरुंदरकर (शिवरात्र : )
मदनलाल पहवाने गांधीजींवर २० जानेवारीला बॉंब टाकला, नथुरामने ३० जानेवारीला गोळी घातली. न्यायालयाने दोन्ही घटना एकाच कटाचा भाग होत्या हे सिद्ध मानले. म्हणजे बॉंब टाकून गांधी-हत्या करावी (मग त्यासाठी काही निरपराध बळी पडले तरी हरकत नाही) हा मूळ कट.
तो विफल झाला तेंव्हा गोळी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोडसे यांचे म्हणणे आणि हा एकच कट होता या बाबी विचारात घेता मदनलाल पहवा डॉ जैन यांना १०-११ जानेवारी १९४८ रोजी भेटला त्यावेळी कट शिजलेला होता असे म्हणावे लागेल. ता. १३ जानेवारी १९४८ रोजी नथुरामने आपला विमा सौ चंपूताई यांच्या नावे केल्याचा पुरावा आहे. म्हणजे १३ जानेवारी पर्यंत गांधीजींचा खून बॉंब टाकून करावा, ते न जमल्यास त्यांना गोळी घालून मारावे, हे दोन्ही निर्णय ठरलेले दिसतात.
मदनलाल डॉ जैन यांना १० - ११ जानेवारीला भेटला त्याआधी काही दिवस कट निश्चित झालेला होता. तपशिलाने कटाची रचना करणे संपले होते. म्हणजेच गांधीहत्येचा कट पाकिस्तानला ५५ कोटी भारत सरकारने नाकारण्यापूर्वी, म्हणजेच गांधीजींनी उपोषण सुरु करण्यापूर्वी (१३ जानेवारीपूर्वी) निश्चित झाले होते. (म्हणजेच) ५५ कोटींचा विचारही गांधीहत्येचा कट रचताना कुणाच्या मनात असण्याचे काही कारण नव्हते.
त्यावरून प्रश्न असा उदभवतो की, मग गांधीजींच्या हत्येची गरज त्या खुन्यांना का वाटली असाव.....???
----------------------------------------------------------------------------
नरहर कुरुंदरकर (शिवरात्र : )
मदनलाल पहवाने गांधीजींवर २० जानेवारीला बॉंब टाकला, नथुरामने ३० जानेवारीला गोळी घातली. न्यायालयाने दोन्ही घटना एकाच कटाचा भाग होत्या हे सिद्ध मानले. म्हणजे बॉंब टाकून गांधी-हत्या करावी (मग त्यासाठी काही निरपराध बळी पडले तरी हरकत नाही) हा मूळ कट.
तो विफल झाला तेंव्हा गोळी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोडसे यांचे म्हणणे आणि हा एकच कट होता या बाबी विचारात घेता मदनलाल पहवा डॉ जैन यांना १०-११ जानेवारी १९४८ रोजी भेटला त्यावेळी कट शिजलेला होता असे म्हणावे लागेल. ता. १३ जानेवारी १९४८ रोजी नथुरामने आपला विमा सौ चंपूताई यांच्या नावे केल्याचा पुरावा आहे. म्हणजे १३ जानेवारी पर्यंत गांधीजींचा खून बॉंब टाकून करावा, ते न जमल्यास त्यांना गोळी घालून मारावे, हे दोन्ही निर्णय ठरलेले दिसतात.
मदनलाल डॉ जैन यांना १० - ११ जानेवारीला भेटला त्याआधी काही दिवस कट निश्चित झालेला होता. तपशिलाने कटाची रचना करणे संपले होते. म्हणजेच गांधीहत्येचा कट पाकिस्तानला ५५ कोटी भारत सरकारने नाकारण्यापूर्वी, म्हणजेच गांधीजींनी उपोषण सुरु करण्यापूर्वी (१३ जानेवारीपूर्वी) निश्चित झाले होते. (म्हणजेच) ५५ कोटींचा विचारही गांधीहत्येचा कट रचताना कुणाच्या मनात असण्याचे काही कारण नव्हते.
त्यावरून प्रश्न असा उदभवतो की, मग गांधीजींच्या हत्येची गरज त्या खुन्यांना का वाटली असाव.....???
