Ajit Anushashi
ये मसाईल-ए-तसव्वुफ़ ये तिरा बयान 'ग़ालिब'
तुझे हम वली समझते जो न बादा-ख़्वार होता
तुझी ही प्रतिभेची भरारी
तुझी ही (जबरदस्त) अभिव्यक्ती
हाय रे गालिब
आम्ही तर तुला संत समजलो असतो
जर तू बेवडा नस्तास...!!
हे उद्गार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे, तर खुद्द गालिबने आपल्या एका सुप्रसिद्ध गजलमध्ये स्वतःविषयी काढलेले आहेत. आणि खरोखरच, गालिबच्या साहित्याची प्रतिभा आणि प्रत्यक्षातली त्याविषयीची प्रतिमा, यात अगदी हेच अंतर आहे. उर्दू साहित्याची आणि खासकरून गालिबची उडतउडत माहिती असणाऱ्यांना गालिब म्हटलं, की 'हाय कम्बख्त, तूने पी ही नहीं।' किंवा 'इश्क़ ने ग़ालिब निकम्मा कर दिया', वगैरे तेवढा आठवतो आणि त्या नादात त्याच्या काव्याचा चतुरस्त्र संचार, त्याच्या भाषेची गेयता, त्यातली अतिशयोक्तीपूर्ण अलंकारीकता आणि त्यातून मांडलेलं तत्त्वज्ञान हे सगळं आपल्यापर्यंत पोचतच नाही.
१७९७ साली, म्हणजेच तब्बल २२० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जन्माला आलेला गालिब, हा उर्दूतला सर्वाधिक ज्ञात आणि बहुदा लोकप्रियही शायर आहे. त्याच्या काळात मोगली सत्ता संपूर्णतः कमकुवत होऊन लयाला गेली. अर्थात त्याचवेळेला ढासळत्या पण संपन्न सरंजामशाहीत पाहायला मिळतो, तो कला, नृत्य, पाककौशल्य, संगीत, साहित्य, स्थापत्य याचा अद्भुत आणि अजोड असा आविष्कारही घडत होता. राजसत्ता लयाला गेली, तरी या आविष्काराचा समृद्ध वारसा अडीचशे वर्षांनंतर आजही लोकमानसाची घट्ट पकड ठेवून आहे. गंगा-जमनी तहजीब म्हटल्या गेलेल्या या संस्कृतीच्या सुवर्णयुगाचा गालिब निव्वळ एक शिलेदार नव्हता, तर अत्यंत जागरूक साक्षीदारही होता. मोगली सत्तेचं क्रमशः होत गेलेलं अधःपतन, १८५७ ची थरारक वर्षं, त्यानंतर झालेली दिल्लीची कत्तल, या सर्वांची गालिबने आपल्या लिखाणात दखलही घेतलेली आहे. किंबहुना इतिहासकारांना तो एक बहुमूल्य माहितीचा स्त्रोत आहे, हे अनेकांना अज्ञात आहे.
मात्र अशा उपभोगप्रधान संस्कृतीतला असला, तरी गालिब त्याच्याच मश्गुल नाही. त्याच्या काव्यात हतबलता, दुःख आणि जीवनेच्छा, आवेग याचा मिलाप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिर्बंध आणि ठाम व्यक्तिवाद आहे.
रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था
असं म्हणून तो मीर तकी मीर या शायराची थोरवी मान्य करतो.
बे-ख़ुदी बे-सबब नहीं 'ग़ालिब'
कुछ तो है जिस की पर्दा-दारी है
ही तो स्वतःला आठवण करून देतो.
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
असा तो वास्तववादीही होतो.
उर्दू शायर नेहमीच काव्यात स्वतःचं टोपणनाव वापरतात. पण गालिब स्वतःचं नाव वापरताना त्याचा सभोवताल, स्वभाव, कुव्वत आणि अगदी मर्यादा, यावरही तटस्थ आणि कठोर भाष्य करतो. सरंजामी युगातला असूनही भारतीय समाजाच्या रेनेसान्सचा तो हिस्सा आहे, तो म्हणूनच.
अर्थात गालिबचं व्यक्तिगत आयुष्यही दैवाने आणि कर्मानेही दुःखी होतं. मुलं जगली नाहीत, स्थिर उत्पन्न मिळालं नाही, नातेवाईकांनी फसवलं, बादशहाने पुरेशी दखल योग्य वेळी घेतली नाही. या सर्वांसोबत जुगार आणि दारूचा शौक होताच. किंबहुना आयुष्यातलं दुःख, व्यसनं आणि असामान्य नवनवोन्मेषाची ओढ यातलं द्वंद्व गालिबच्या काव्यात ठायीठायी दिसत राहातं. यातूनच जन्माला येते ती त्याची अतिशयोक्तीची आस… त्याच्या आकांक्षा दोन पाच नाहीत, तर…
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
अश्या आहेत. त्याची प्रेयसी नुसती दुर्लक्ष करत नाही, तर…
आह को चाहिए इक उम्र असर होते तक
कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक
एवढी कठोर होते.
पण ही तडफड, नुसती प्रेयसीच्या विरहाची वगैरे नाही. गालिब उर्दूतला पथदर्शी महान शायर बनला, करण प्रेम आणि प्रेमभंगाच्या पारंपरिक कवितेच्या पलीकडे त्याची लेखणी पोचली.
न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता
डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता
किंवा
मौत का एक दिन मुअय्यन* है
नींद क्यूँ रात भर नहीं आती
*निश्चित
असे गहन प्रश्न त्याला पडले, तशीच…
रहिए अब ऐसी जगह चल कर जहाँ कोई न हो
हम-सुख़न कोई न हो और हम-ज़बाँ कोई न हो
अशी विरक्ती त्याने मांडली.
रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है
अशी रसरशीत जीवनाकांक्षा जशी त्याला सुचली, तशीच
'ग़ालिब' हमें न छेड़ कि फिर जोश-ए-अश्क# से
बैठे हैं हम तहय्या-ए-तूफ़ाँ* किए हुए
#अश्रूंचा महापूर
*वादळाची तयारी
अशी जिद्दही त्याला सुचली. आणि या सर्वांसोबत त्याची विनोदाची एक तीक्ष्ण तैलबुद्धीही शाबूत होती. बादशाहाचा प्रिय असलेल्या जौकला उद्देशून तो उपहासाने म्हणाला…
हुआ है शह का मुसाहिब* फिरे है इतराता
*गुलाम
पण हे बादशाहाच्या कानावर गेल्यावर, दुसऱ्या ओळीत त्याने अर्थ फिरवला…
वगर्ना शहर में 'ग़ालिब' की आबरू क्या है
१८५७ नंतर मुस्लिमांची जी कत्तल ब्रिटीशांनी दिल्लीत केली, त्यात गालिबही सापडला. तेव्हा तू मुसलमान आहेस का? या प्रश्नाला चतुर गालिब म्हणे, "आधा मुसलमान हूँ। शराब पीता हूँ, सुअर नहीं खाता।”
गालिबच्या या प्रतिभेची भुरळ भल्याभल्याना पडली. अगदी।आपल्या पाडगावकरांनी
'हाती धनुष्य ज्याच्या
त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या
त्यालाच दुःख ठावे'
हे थेट गालिबच्याच
कोई मेरे दिल से पूछे तिरे तीर-ए-नीम-कश को
ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता
याच्यावरून घेतलेलं आहे. गुलाजारांच्या सुप्रसिद्ध
दिल ढूँडता है फिर वही फ़ुर्सत कि रात दिन
बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किए हुए
गाण्यातल्या या दोन ओळी गालिबच्याच. त्यांनी तर त्याच्यावर मालिकाही बनवली आणि पुस्तकही लिहिलं. गुलाम अली, मेहदी हसन, बेगम अख्तर, इकबाल बानो, जगजीत सिंग, अश्या अनेक गुणवान गायकांनी गालिबच्या शब्दांना आपल्या संगीताने अमर केलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्याच्या जयंतीला आयुष्याची गुपितं उलगडून सांगणारा हा शायर आठवायलाच हवा, तोही त्याच्याच शब्दात…
हैं और भी दुनिया में सुख़न-वर बहुत अच्छे
कहते हैं कि 'ग़ालिब' का है अंदाज़-ए-बयाँ और
No comments:
Post a Comment