मी भारतिय आहे!
पुरेसे नाही का इतके?
युक्रेन-पोलंड बॉर्डरवर जमलेल्या विदेशी नागरिकांच्या गर्दीमधल्या एका विद्यार्थ्याची गचांडी पकडून, संतापलेल्या युक्रेनी सैनिकाने दात ओठ खात प्रश्न केला.
Who are you?
मागील २ दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या २३ वर्षीय तरुणाने अगदी भेदरलेल्या अवस्थेत डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत, थरथरणाऱ्या ओठांनी उत्तर दिलं.
I am Indian.
त्यानंतर तासाभराने त्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांसमवेत बॉर्डर ओलांडण्याची परवानगी मिळाली आणि अंगातील उरल्या सुरल्या ताकदीने तो धावतच जाऊन एअर इंडियाच्या विमानात बसला.
विमान मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर, मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप घरी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आलेल्या नातेवाईकांनी हात उंचावून एकच जल्लोष केला.
त्यातच मायदेशी परतलेल्या या विद्यार्थ्यांचे बरेवाईट अनुभव जाणून घेण्यासाठी एक पत्रकार पुढे झाला आणि त्याने समोरून येणाऱ्या तरुणाला अगदी उत्सुक चेहऱ्याने प्रश्न केला.
मित्रा कुठला आहेस? मराठी, गुजराती की तमिळ?
का कोण जाणे पण, त्या तरुणाने केविलवाण्या चेहऱ्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि त्यानंतर स्वतःच्या खिश्यावरील तिरंग्याकडे बोट दाखवत डबडबलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं.
भारतीय आहे.
त्या तरुणाने उच्चारलेल्या त्या दोन शब्दांनंतर, टाळ्यांचा एकच कडकडाट झाला आणि लागोपाठ भारत मातेचा जयजयकार करणाऱ्या घोषणा कानी पडू लागल्या.
देशात आपली ओळख हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, मराठा, माळी, महार, चांभार, सुतार, तेली, वंजारी, बिहारी, राजस्थानी, जाट, सिंधी किंवा जात, धर्म व प्रांतानुसार कुठलीही जरी असली, तरी जन्मभूमीचे उपकार म्हणून मिळालेली 'भारतीय' हीच आपली एकमात्र अधिकृत ओळख आहे हे विसरता कामा नये.
- अक्षय भिंगारदिवे ©
No comments:
Post a Comment