Saturday, 25 December 2021

संतती नियमनाच्या पल्याड, र.धों. च कार्य समजून घेणं गरजेचं आहे!

राजू परुळेकर सर 


'संतती नियमनाच्या पल्याड, र.धों. च कार्य समजून घेणं गरजेचं आहे!'

कामजीवन अश्लील आणि घाणेरडे असून ते पावित्र्याला बाधा आणते, असं समजणाऱ्या कालखंडामध्ये संतती नियमनाच्या पल्याड जाऊन कामजीवनावर शास्त्रीय आणि तर्कशुद्ध भूमिकेतून लिखाण करणारे समाजस्वास्थकार र.धों. कर्वे यांचा आज आठवण दिवस.

खरं तर आजही आपल्या समाजामध्ये लैंगिक शिक्षण वर्ज्य मानलं जातं. लैंगिकतेबद्दल जर का लिहिलं, बोललं तर ते अश्लाघय आणि अपवित्र मानलं जातं. आजही जर अशा पद्धतीने लैंगिकतेबद्दल लिखाण केल गेलं तर त्याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जात. याच कारण म्हणजे, मानवाचा लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन. लैंगिकतेकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन असणं गरजेचा आहे तो आपण विकसित करू शकलेलो नाही आहोत. 

अशा लिखानाद्वारे (शास्त्रीय आणि तर्कसुसंगत लिहिलेलं लेखन असलं तरी) लोकं, मुलं बिघडतात अशी धारणा कमी अधिक प्रमाणात प्रगत अप्रगत राष्ट्रांमध्ये पाहायला मिळते. सगळ्याच बाबतीत प्रगत असणाऱ्या, प्रगती करू पाहणाऱ्या समाजामध्ये याच विषयाच्या बाबतीत मागासलेपण पाहायला मिळत. अगदी विवाहित असणाऱ्या जोडप्यामध्ये देखील या विषयावर फार क्वचित चर्चा होत असेल. 

प्रा.र.धो कर्वे यांनी  लैंगिकता, संतती नियमन वगैरे गोष्टींवर केलेलं लेखन हे पाश्चात्य लेखकांच्या तुलनेत मला भारतीय समाजाचा विचार करता खुच क्रांतिकारक वाटतं. मी २००५ साली ' Masters and Johnson on Sex and Human Loving ' पुस्तक खरेदी केलं त्यावेळी या पुस्तकाची पंचवीसावी आवृत्ती प्रकाशित झालेली होती.  पण अवघ्या एक दोन वर्षापूर्वी मला र.धो यांचं लेखन वाचावयास मिळालं त्यावेळी जाणवलं की प्रचंड क्षमता आणि अभ्यासू असणारा हा लेखक काळाच्या किती तरी पुढे होता. तर असो...

खर तर आज आपण जे शासकीय पातळीवर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना सुचवतोय ते उपाय र.धो नी १९२१ साली मुंबईमध्ये परळ येथे ' संतती नियमन केंद्र ' काढून केले! लोकसंख्या आणि संतती नियमन हे विषय त्यांनी प्रथमतः इंग्रजी आणि नंतर मराठीतून लिहिले. अर्थातच त्यावेळी हे विषय वर्ज्य मानले जायचे. आजही मी संसोधनाच्या अनुषंगाने पुरुषांना कंडोम, कॉपर T, पिल्स, इंजेक्शन किंवा शारीरिक संबंध ठेवताना काय काळजी घेता? बायकोची मर्जी विचारात घेता का? असे प्रश्न विचारतो तेंव्हा पुरुष मोकळेपणाने बोलत नाहीत. आजही सेक्स हा विषय बायकोसोबत मिळून बोलला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. वैवाहिक सुसंवाद ही गोष्ट आजही आपल्या पचनी पडत नाही. ही अवस्था आजमितीला मोबाईल वर एका क्लिकवर अनेक साईट ओपन होणाऱ्या काळातील आहे. पण र.धो नी अशा काळात लोक प्रबोधन केलं ज्या काळात हे लैंगिकता, निरोध, कुटुंब नियोजन वगैरे ऐकण पाप मानल जायचं! 

असं असलं तरी त्यांनी त्यांचं लेखन थांबवलं नाही सन१९२७ पासून त्यांनी लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन वगैरे विषय डोळ्यासमोर ठेऊन ' समाजस्वास्थ्य ' मासिक सुरू केलं काही अपवाद वगळता  २६ वर्षे त्यांनी अखंड हे मासिक चालू ठेवलं होत पण आर्थिक अडचणी मुळे त्यांच्या मृत्यूनंतर हे मासिक बंद पडल. याच मासिकातून त्यांनी ' संतती नियमन ' , ' विवाह संस्था ' , ' विनय म्हणजे काय? 'व्यभिचाराचा प्रश्न' इत्यादी लेख लिहिले. दुर्दैवाने यातील काही लेखाबद्दल आक्षेप घेत त्यावेळेस च्या काही मंडळींनी त्यांच्यावर खटले भरले त्यातील एक खटला तर खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी र.धो.कर्वे यांच्या बाजूने लढला होता. एका खटल्यासंदर्भातील नोटीस तर र.धो गेल्यानंतर आली होती. 

र.धोंच लेखन वादग्रस्त वाटायचं खर तर काहीच कारण नाही कारण ' विनय म्हणजे काय ' या त्यांच्या लेखात ते म्हणतात की ' विनय किंवा लज्जा हा स्त्रियांचा स्वाभाविक गुण नसून सामाजिक परिस्थितीमुळे उत्पन्न होतो, हे थोड्याशा विचारांती सहज दिसून येईल. मुलींमध्ये स्वाभाविक रीतीने लज्जा उत्पन्न होत नसून आया मुलीस लाजण्यास शिकवतात, असे आमच्या पाहण्यात आहे.' (या संदर्भात त्यांनी काही उदाहरण दिली आहेत) त्याच्यापुढे जाऊन ते याच लेखात एके ठिकाणी म्हणतात की,' समागम म्हणजे पाप ही कल्पना रानटी लोकांत नसते व म्हणूनच या कल्पनेची अनुषंगिक लज्जा ही त्यांच्यात दिसत नाही ' पुढं जाऊन ते लिहितात की, ' विनय म्हणजे ढोंग आहे '! 

मानवी नग्नते संदर्भात अगदी तर्कनिष्ठ विश्लेषण त्यांनी केलं आहे. ते खालील  परिच्छेदातून आपल्याला दिसेल,
'वस्तुतः स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या नग्न शरीरात तटस्थ वृत्तीने पाहणाराला लाज वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु नैसर्गिक प्रवृत्ती दडपून टाकू पाहणाऱ्या सामाजिक निर्बंधाच्या तडाख्यात मनुष्याची तटस्थ वृत्ती राहावी कशी? स्त्री पुरुषाच्या परस्पर आकर्षणामुळे परस्परांचे अनावृत्त शरीर पाहण्याची दोघांस ही इच्छा असणे स्वाभाविक आहे. ही इच्छा नैसर्गिक असल्यामुळे ती दाबण्याचा जितका प्रयत्न करावा, तितकी ती अधिक प्रबळ होते.'  

स्त्री पुरुष समागम याबद्दल ते लिहितात,
' अविवाहित स्त्री पुरुषांच्या समागमाचीही हीच स्थिती आहे, स्त्रियांचे बाबतीत कौमार्य हा एक भयंकर मोठा सद्गुण मानला जातो. परंतु पुरुषांच्या बाबतीत ते कळणेच शक्य नसते. विशिष्ट वयापूर्वी समागमाने स्त्रीचे नुकसान होईल व ते कायद्याने बंद केलेले आहे, हे योग्यच आहे. परंतु त्यापुढे समगमने नुकसान न होता फायदा होतो व यात विवाहाचा काही संबंध येत नाही. तेंव्हा शास्त्रीय दृष्टीने यात काही नुकसान नाही' 
असे अनेक मुद्दे प्रा.र.धो कर्वे यांनी त्यांच्या लेखनातून मांडले परंतु आपण आजही या गोष्टी समजून घ्यायला कितपत तयार झालो आहोत हादेखील कळीचा प्रश्न आहे!

🍁 योगेश कुदळे repost

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...