विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. विद्या ही तलवारीसारखी आहे परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही. परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्यासाठी त्या फसविण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भास होऊ शकतात.
लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते. परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अगर फसवाफसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्यासवरलेल्या लोकात शीलाची अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकले-सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२,पान नं. १९३.)
दि.११ सप्टेंबर १९३८ रोजी पुणे येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या ११ व्या संमेलनात डी.सी. मिशनच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
No comments:
Post a Comment